कविता - नसण्याचं मोल
तू आज म्हणतेस,
“तुझ्याविना
काहीच उरलं नाही...”
पण मी असताना
तुझ्या दिवसांच्या वहीत
माझं पान
कधी उघडलंच नव्हतंस.
मी तुझ्या दुःखाला
माझ्या खांद्यावर घेतलं,
तुझ्या हसण्यात
माझं समाधान शोधत राहिलो.
माझ्या मनातली
न बोललेली वाक्यं
दररोज विरत होती;
पण तू एकदाही विचारलं नाहीस—
“आज तू एवढा शांत का?”
मी तुझ्या आयुष्यात
श्वासासारखा
सोबत राहिलो;
तरीही माझं असणं
तुला कधी कळलंच नाही.
एक दिवस
मी निघून गेलो...
दरवाजा बंद झाला;
घर तसंच राहिलं,
पण त्यातून
एक ओळखीचा आवाज
कायमचा हरवला.
आता माझ्या नावाने
तुझे डोळे भरतात;
शांततेतही
तुला माझी चाहूल लागते.
जिथे रोज
माझ्या पावलांची चाहूल होती,
तिथे आता
केवळ शांतता नांदते.
माझ्या नसण्याचं दुःख
आता कशाला करतेस?
मी तर एवढंच मागत होतो—
माझ्या शांततेत
एकदा तरी
माझं मन ऐक.
काही माणसं
निघून गेल्यावर संपत नाहीत;
ती उरतात...
तुझ्या प्रत्येक आनंदाच्या
काठावर थांबलेली
एक उणीव बनून.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०३/०९/२०२६ वेळ:१२:५१
Post a Comment