कविता – मैत्री
कधी बालपणीच्या अंगणात
मातीच्या खेळांतून उमललेली,
कधी आयुष्याच्या वळणावर
अचानक मिळालेली एक हळवी साथ...
हळूहळू तीच साथ
मनाच्या आकाशात
विश्वासाची पहाट बनते;
आणि काळाच्या प्रवासातही
अंतरीची ऊब देत राहते.
न बोलताही मनातील
शब्द ओळखणारे,
डोळ्यांतील अश्रूंना
हळुवार अर्थ देणारे,
मनाच्या बंद दारावर
आपलेपणाची अलगद थाप देणारे
एक निःशब्द नाते असते...
ते म्हणजे मैत्री.
सुखाच्या क्षणी
आनंदाचे रंग भरणारे अनेक भेटतात;
पण दुःखाच्या वाटेवर
मनाला धीर देणारी
विश्वासाची सावली
असते मैत्री.
जेव्हा जगण्याच्या वाटेवर
अंधार दाटून येतो,
तेव्हा हरवलेल्या आशांना
पुन्हा उमेद देणारी
एक नवी पहाट
असते मैत्री.
स्वप्नांचे तुकडे झाले तरी
नव्या सुरुवातीची चाहूल देणारी,
पडताना सावरणारी,
हरताना धीर देणारी
मनात सदैव फुलणारी
एक सुंदर चाहूल
असते मैत्री.
काळ बदलतो,
वाटा बदलतात,
अंतर वाढते;
पण मनाच्या पुस्तकातील
मैत्रीचे पान
कधीच फिकट होत नाही.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०२/०८/२०२६ वेळ: ०६:४८
Post a Comment