कविता – नशिबाच्या ओंजळीत


कविता – नशिबाच्या ओंजळीत


सुखासाठी
कधीच हात पसरले नाहीत;
कारण
स्वाभिमानाच्या मातीतच
खऱ्या आनंदाची बीजे
रुजत असतात.

दुसऱ्याच्या दारी मिळालेला
आनंद
क्षणभर डोळे उजळवतो;
पण स्वतःच्या कष्टांनी
उमललेलं एक फूल
संपूर्ण आयुष्य
सुगंधित करून जातं.

बीजाला
फुलण्याची घाई नसते;
मातीची कुशी,
संयमाची ऊब
आणि घामाचे थेंब
लाभले की
तेही
बहरून येतं.

माणसाचं आयुष्यही
असंच फुलत असतं—
याचनेनं नव्हे,
तर कष्टांच्या सरींनी
आणि विश्वासाच्या उजेडानं.

जे माझ्या वाट्याचं आहे,
ते माझ्यापर्यंत
योग्य वेळी
अवश्य येईल;
जशी
ऋतूची चाहूल लागताच
फांदीवरील फळ
अलगद पिकतं,
तसाच
प्रामाणिक कष्टांचा
प्रत्येक क्षण
यशाचा बहर
घेऊन येतो.

नशिबाच्या ओंजळीत
जेवढी बीजे
सामावली आहेत,
ती उगवणारच;
पण
त्यांना
घामाचे थेंब
आणि संयमाची ऊब
मिळालीच पाहिजे.

म्हणून
मी अपेक्षेपेक्षा
विश्वास जपतो;
याचनेपेक्षा
कर्तृत्वाची वाट धरतो.

कारण
स्वतःच्या कष्टांनी
फुललेलं सुख
कधीच उधार नसतं;
स्वाभिमानानं जगलेलं जीवन
हेच
नशिबाच्या ओंजळीत
अलगद विसावलेलं
सर्वांत अनमोल फळ असतं.


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक: ०८/०७/२०२६ वेळ: ०२:०७

Post a Comment

Previous Post Next Post