शब्दांना ज्यांनी दिले
विचारांचे तेजस्वी रंग,
मराठीच्या विशाल नभात
ज्ञानसूर्याचे पसरले तरंग।
ग्रंथ नव्हे फक्त त्यांच्या हाती,
एक चालते विद्यापीठ महान,
प्रत्येक भेटीतून लाभे
ज्ञानप्रकाशाचे अमृतदान।
साहित्य त्यांच्या श्वासामध्ये,
मराठी त्यांच्या ध्यासामध्ये,
प्रबोधनाच्या दीपज्योतीने
उजळले जनविश्वासामध्ये।
सभागृहातील प्रत्येक शब्द
मनामध्ये ठसा उमटवी,
त्यांच्या ओजस्वी वाणीतून
नवसंस्कारांची ज्योत पेटवी।
वयाच्या पंचाहत्तरीतही
उत्साह अखंड तेजाळता,
खांद्यावर ज्ञानाची पताका
प्रवास अखंड सळसळता।
गावोगावी फिरताना
जागवितात नवी चेतना,
सुप्त मनांच्या मातीत
रुजवितात नव्या कल्पना।
त्यांच्या लेखणीतून उमलते
सत्य, समता, संस्कार,
त्यांच्या विचारांच्या प्रवाहातून
उजळतो मानवतेचा संसार।
सबनीस सर म्हणजे जणू
माय मराठीचे अनमोल लेणं,
त्यांच्या कार्याला वंदन करत
नतमस्तक होते हे जगणं।
जोवर मराठीचा स्वर जिवंत,
तोवर तुमचे कार्य महान,
ज्ञानदीपाच्या या तेजोनिधीचे
काळही करतो गुणगान।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १५/०५/२०२६ वेळ: ०७:११
Post a Comment