कविता – प्रश्नांच्या ज्योती

विवेक जागर संस्था – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई जिल्हा कवी संमेलन – २०२५

विषय : वैज्ञानिक दृष्टिकोन

शीर्षक : प्रश्नांच्या ज्योती

विज्ञान म्हणजे फक्त सूत्र नव्हे,
तो विचारांचा — जिवंत श्वास आहे.
प्रश्न विचारणं — हीच खरी प्रार्थना,
आणि शोध घेणं — म्हणजे साधना!

भयाच्या सावलीत — जेव्हा श्रद्धा थरथरते,
तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवा पेटवतो.
तो कुजबुजतो —
“विश्वास ठेवा... पण कारणही जाणून घ्या!”

आकाशाकडे पाहणं पुरेसं नाही,
त्या ताऱ्यांचं मोजमाप समजून घ्या.
देव दिसला नसेल... पण गुरुत्वाकर्षण जाणवतं,
हेच तर ज्ञानाचं सौंदर्य आहे!

अंधार फोडणारा प्रकाश नाही,
तर विचार आहे... प्रयोग आहे!
जगाला चालना देणारी ती जिज्ञासा,
हाच माणसाचा — खरा धर्म आहे!

श्रद्धेच्या पलीकडचं सत्य शोधताना,
भीती नाही — बुद्धी उभी राहते!
विज्ञान शिकवतं —
“चुकलं तरी चालेल... पण शोध थांबवू नकोस!”

शोध थांबवू नकोस, विचार थांबवू नकोस!
कारण — या ज्योतीतच माणूस उजळतो,
आणि विवेकाचा सूर्य उगवतो...

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २५/१०/२०२५ वेळ : १०:४४


गुरु दादा, तुमची "प्रश्नांच्या ज्योती" वा!! काय कल्पना आहे. सुंदर कविता👌 एकदम भावली. विज्ञान युगात आपण असं जगायला हवं खूप छान 💐👌

जयश्री हेमचंद्र चुरी

🙏🙏🙏🙏

जयश्री ताई,

आपला हा उत्स्फूर्त आणि मनाला स्पर्श करणारा अभिप्राय वाचून मन आनंदाने उजळून निघालं. “प्रश्नांच्या ज्योती” ही कविता आपण इतक्या प्रेमाने स्वीकारली आणि तिच्या कल्पनेतील वैशिष्ट्य आपण मनापासून जाणलं — हे माझ्या लेखणीसाठी खऱ्या अर्थाने अनमोल प्रेरणाच आहे.

विज्ञानयुगात प्रश्न विचारणं, जिज्ञासा जागी ठेवणं आणि विचारांची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवणं — हाच या कवितेचा आत्मा. आपण तो इतक्या नेमकेपणाने अनुभवला, हे माझ्यासाठी मोठं समाधान आणि पुढील लेखनाची नवी ऊर्जा आहे.

आपली प्रत्येक ओळ आपुलकीने भारलेली आहे. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि मनस्वी शब्दांसाठी मनःपूर्वक आभार. 🙏🙂

आपल्यासाठी अशाच आणखी विचारांना उजाळा देणाऱ्या रचना साकार करण्याचा प्रयत्न अविरत सुरू राहील.

— गुरुदादा

🟰🟰🟰🟰

नमस्ते सर,
आपली , "प्रश्नांच्या ज्योती" ही कविता खूप आवडली. धार्मिक कर्मकांड व अंधश्रद्धा यात मानवजात अडकली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून परंपरा, रितीरिवाज समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ही बाब आपण आपल्या कवितेतून प्रकर्षाने अभिव्यक्त केली आहे. संतांनी भक्ती मार्गाची शिकवण देताना ज्ञान,विवेक याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संत नामदेवराय म्हणतात '"नाचू कीर्तनाचे रंगी,ज्ञानदीप लावू जगी" हेच तर आपणही सांगत आहात.. विकास हवा असेल विज्ञानाचा दीप हाती धरून वाटचाल करावी लागेल..
कवितेचा आशय आणि विषय खूप भावला..
अभिनंदन 💐

मोरेश्वर बागडे

🙏🙏🙏🙏

मोरेश्वर सर,

आपला हा अत्यंत अभ्यासपूर्ण, संतपरंपरेच्या सूक्ष्म जाणिवेने उजळलेला अभिप्राय वाचून मन अक्षरशः आनंदून गेलं. ‘प्रश्नांच्या ज्योती’ या कवितेचा गाभा आपण इतक्या नेमक्या विचारसरणीने उलगडला — हीच माझ्या लेखणीसाठी सर्वात मोठी पावती आहे.

धार्मिक अंधश्रद्धा, आडाखे, भीती आणि चुकीच्या समजुती यांच्या गर्तेत मानवजात अडकत चालली आहे — ही वस्तुस्थिती आपण व्यक्त केलेल्या शब्दांत आणखी प्रभावीपणे प्रकट होते. परंपरा हे समजून घेण्याचे विज्ञान आहे; कर्मकांड हे निरीक्षणाची प्रक्रिया आहे; आणि श्रद्धा तेव्हाच समर्थ होते, जेव्हा तिच्या पायाशी ज्ञानाचा दीप प्रज्वलित असतो.

आपण दिलेला संत नामदेवरायांचा संदर्भ तर या कवितेच्या संदेशाला जणू तत्त्वार्थाचा आधार देतो—
*“नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी”*
या ओळींमध्ये भक्ती, विवेक आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम आहे. मी कवितेत नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता — विकास हवा असेल, तर प्रश्न विचारण्याची हिंमत, विवेकाची दृष्टि आणि विज्ञानाचा दीप हाती असावा.

आपण कवितेच्या आशयाला दिलेला इतका सखोल प्रतिसाद माझ्यासाठी अतिशय मोठं प्रोत्साहन आहे.
आपल्या शब्दांनी माझ्या लेखणीला नवी प्रेरणा लाभली.

आपले मनःपूर्वक आभार. 🙏🙂

— गुरुदत्त दिनकर वाकदेकर

🟰🟰🟰🟰

Post a Comment

Previous Post Next Post