तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित
भव्यदिव्य राज्यस्तरीय महाकवी कालिदास काव्य लेखन करंडक स्पर्धा
विषय : महाकवी कालिदास
काव्यप्रकार : मुक्तछंद
शब्द मर्यादा : कमीत कमी २० ओळी. जास्तीत जास्त २८ ओळी.
स्पर्धा दिनांक : २६ जून २०२५
पहाटे ३.४० ते रात्रौ ११.५५ पर्यंत
शीर्षक : “मेघदूताच्या पाऊलखुणा…”
कवितेच्या नभांगणात
गंधाळलेली सावली फिरते—
ती महाकवी कालिदासांची...
आषाढात पावसाचा गंध घेऊन
"मेघदूत" अजूनही मनावर कोसळतो...
त्या एका यक्षाच्या संदेशातला
विरह, प्रेम, आणि प्रतीक्षेचा गहिरा सूर
आजही अंतर्मनात पाझरत राहतो...
त्यांच्या लेखणीने ऋतू बोलले,
वसंताचे रंग, शरदाची शांतता
शब्दांतून जिवंत झाली...
कुमारसंभवात शिव तेजाळतो,
रघुवंशात धर्म, मर्यादा नांदतात,
शाकुंतलमधून प्रेम, विस्मरण आणि स्मृती
सत्यासारख्या पांघरत उभ्या राहतात...
ते नुसते कवी नव्हते —
ते होते शब्दांचे शिल्पकार.
उपमांचा, उत्प्रेक्षांचा नवा आराखडा
त्यांनीच रेखाटला होता...
त्यांच्या प्रत्येक श्लोकात
संवेदना उगम पावते,
संस्कृतीचे तेज झळाळते...
शतकांनंतरही त्यांच्या काव्याचा पाऊस
मनाला चिंब भिजवतोय...
महाकवी कालिदास, तुम्ही काळाच्या ओंजळीत
अजरामर दीपस्तंभासारखे उजळताय —
शब्दांचे, शौर्याचे आणि
संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २६/०६/२०२५ वेळ : २३:४०
Post a Comment