कविता - आशेचा दीप
ज्याच्या डोळ्यांत
उद्याचं स्वप्न असतं,
ज्याच्या मनात
आशेची हिरवी पालवी फुलते,
तोच माणूस
प्रत्येक वादळातूनही
हसत पुढे चालत राहतो.
परीक्षेचे क्षण
कधीच सोपे नसतात,
प्रश्नांचे डोंगर
समोर उभे ठाकतात,
तरीही आशेचा हात
घट्ट धरलेला असेल,
तर पावलांना
भरकटण्याची भीती नसते.
आशा म्हणजे
काळोखातला शांत दीप,
आस म्हणजे
थकलेल्या मनाची शीतल सावली,
हेच दोन पंख
माणसाला देतात बळ,
आणि तो मग
आभाळालाही स्पर्श करतो.
हरवलेल्या वाटांवर
जेव्हा धुकं दाटतं,
तेव्हा हाच विश्वास
दूरवर दिशा दाखवतो,
निराशेच्या राखेतून
नवी ठिणगी चेतवतो,
आणि मन पुन्हा
जगण्याचं गीत गातं.
जिंकणं म्हणजे
फक्त शिखर गाठणं नाही,
तर पडूनही पुन्हा
उभं राहण्याची हिंमत,
हाच खरा विजय असतो.
ज्याच्या अंतरी आशा जागी,
त्याच्या हाती
उद्याचा सूर्योदय लागतो.
रात्र कितीही अंधकारमय असो,
पहाट तिच्या मागेच उभी असते.
मनात आशेचा दीप असेल,
तर प्रत्येक संघर्षानंतर
यशाची पहाट उगवतच असते.
*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*
दिनांक : ०२/०४/२०२६ वेळ : ११:१६
Post a Comment