कविता - मनाच्या शांत लहरी
तो आवाज,
शांत दिसत असला
तरी अंतरी
वादळ उठवत राहतो.
मी हसतो,
पण प्रत्येक शब्द
नकळत जाऊन
तुझ्यापाशीच थांबतो.
निःशब्द आठवणींची
एक हळवी सावली
मनाच्या कोपऱ्यात
सतत विसावलेली असते.
आता सवय झाली
थोडं अबोल राहण्याची,
कोणी भेटलं तरी
मनाची कवाडं सहज उघडत नाहीत.
तरीही अंतरात
एक आस कायम असते,
दुःखाच्या पल्याडही
नवी पहाट उजाडण्यासाठी.
जखमा जरी खोल
मनात जपलेल्या असल्या,
तरी त्यातूनच कधी
संवेदनांची फुलं फुलतात.
मनाच्या शांत लहरींवर
आठवणी हलकेच तरंगतात,
आणि त्यांच्याच ओलाव्यात
जगणं पुन्हा उजळतं.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०४/२०२६ वेळ : ०४:५९
Post a Comment