कविता - कथाहोत्र
कथाहोत्राच्या उबेत
काळ पुन्हा जागा होतो,
राखेखाली दडलेला क्षण
निखाऱ्यासारखा धगधगतो.
गतकाळाच्या पाऊलखुणा
शब्दांच्या मऊ वाळूत उमटतात,
आठवणींच्या शांत दारी
भावनांची फुलं उमलतात.
गत कथांच्या सावल्या
आज प्रकाशात न्हातात,
अनुभवांच्या गाभाऱ्यातून
नवे अर्थ जन्म घेतात.
रंगमंचावर मग
मनांचे ऋतू खुलतात,
हास्य, वेदना, स्वप्ने, अश्रू
एकरूप होऊन झुलतात.
प्रगत रंगमंथनातून
जीवनाचा गाभा उमलतो,
माणसामाणसांतील दुरावा
हळुवार शब्दांनी विरघळतो.
एक कथा संपते,
दुसरी जन्म घेते,
प्रत्येक शेवटामधून
नवी पहाट फुलते.
श्रोत्यांच्या डोळ्यांत
स्वप्नांचे सरोवर दाटते,
वाचकांच्या हृदयावर
एक ओळ कोरली जाते.
कथा म्हणजे फक्त शब्द नाहीत,
त्या जगण्याचे आरसे असतात,
जखमांवर अलगद ठेवलेले
मायेचे हात असतात.
म्हणून कथांच्या संगतीने
मन अधिक निर्मळ होते,
माणुसकीच्या वाटेवरचे
प्रत्येक पाऊल उजळते.
काळ बदलला तरी
ही ज्योत विझू नये,
कथांच्या प्रकाशातून
मनुष्यपण हरवू नये.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०३/२०२६ वेळ :११:५२
Post a Comment