कविता – सांग ना इंद्रायणी, माझा संभाजी राजा कसा होता?
सांग ना इंद्रायणी,
माझा संभाजी राजा कसा होता?
तुझ्या लाटांत उमटलेले
धैर्याचे निनाद,
निळ्या प्रवाहातून उसळणारे
अखंड तेज,
ज्याने काळाच्या छातीवर
शौर्याची ज्योत पेटवली.
डोळ्यांत धगधगती
स्वराज्याची मशाल,
छातीत सिंहगर्जनेसारखा
अढळ निश्चय,
ज्याच्या प्रत्येक श्वासातून
स्वाभिमानाचे पर्व उगवले.
शब्दांपेक्षा प्रभावी
त्याची चाल,
पावलांत कोरलेली
इतिहासाची अमिट रेघ,
जी संकटाच्या काळोखातही
रौद्र प्रकाश देत राहिली.
वेदनांच्या कड्यावर
छाती ताठ ठेवून उभे
अजिंक्य मनोबल,
यातनांवर झळाळणारी
स्वाभिमानाची धार,
जिच्या स्पर्शाने
भीतीचं रूप विसर्जित झाले.
सांग ना इंद्रायणी,
त्या अथांग प्रवाहाला
कधी कंप सुटला होता का,
त्याच्या असह्य वेदनांनी?
जखमांतून झिरपणारे
राष्ट्रतेज,
अश्रूंनाही अर्थ देणारे
त्यागाचे सुवर्ण क्षण.
धर्म — धरा — ध्येय,
या त्रिसूत्रीची
अचल प्रतिज्ञा,
अविचल पर्वतासारखी
निष्ठा,
जिच्या ठशाने
काळालाही हार मानावी लागली.
वादळाच्या छातीत
टिकलेली
संयमाची तेजस्वी ज्योत,
काळालाही पुरून उरणारे
अमरत्व,
क्षणाक्षणाला मृत्यूशी
डोळ्यांत डोळे घालून
उभी ठाकलेली
स्वाभिमानाची छाती.
संभाजी —
शौर्याचं तेजस्वी अक्षर,
मराठी मातीच्या
हृदयावर कोरलेले
अमर स्वप्न.
सांग ना इंद्रायणी,
तुझ्या प्रत्येक लाटेत
आजही निनादणारा
तोच अढळ
स्वाभिमान —
जो अनंतकाळ
माझ्या राजाला चिरंजीव करतो…!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०२/२०२६ वेळ : ०३:३३
Post a Comment