कविता – चेहरा हरवलेली माणसे


कविता – चेहरा हरवलेली माणसे

प्रस्तावना 
“आज… मी तुम्हाला काही माणसांची गोष्ट सांगणार आहे…
जी माणसं रोज आपल्यासोबत चालतात…
पण… ज्यांचे चेहरे कुठेतरी हरवले आहेत.”


रस्त्याच्या वळणावर
धूळ, धूर, धावत्या पावलांत
मी पाहिली— 
काही माणसे,
ज्यांचे डोळे होते… पण नजर नव्हती,
ज्यांचे ओठ होते… पण हसू हरवले होते,
ज्याचे नाव होते… पण ओळख कुठेच नव्हती.

त्यांच्या हातात कागदांच्या पिशव्या,
मनात घोंगावणारं वादळ— 
आणि खांद्यावर उद्याची अनिश्चित बेडी,
मनावर शरीराची थकलेली सावली.

ते चालत होते—
जणू स्वतःपासून पळत, 
आरशात उभा असलेला चेहरा
कधीच विरून गेलेला,
जणू शब्दांच्या गर्दीत
स्वतःचा आवाज हरवलेले.

कधी कधी मला वाटते—
ही चेहरा हरवलेली माणसे
आपणच तर नाही ना?
आपणच…
ज्यांनी स्वप्नांच्या बिया
लोखंडी फाईलीमध्ये गाडून टाकल्या,
प्रेमाच्या गंधाने भरलेल्या श्वासांना
तारीख आणि सहीत विकून टाकले,
आणि आपल्या मनाचा आरसा
जुने पापुद्रे झाकून टाकला.

अशी माणसे
आरशात स्वतःकडे पाहताना
फक्त डोळ्यांतील पाणी पुसतात…
पण स्वतःला ओळखत नाहीत.

कदाचित—
एक दिवस,
वारा जुन्या सुगंधासह परत येईल,
पावसाचा पहिला थेंब
आपल्या गालांवर आपलेच नाव लिहील,
आणि त्या क्षणी,
चेहरा हरवलेली माणसे
पुन्हा एकदा स्वतःला भेटतील…
जशी पहिल्या जन्मात भेटली होती.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०८/२०२५ वेळ : १३:५०

Post a Comment

Previous Post Next Post