कविता - आरसा

कविता - आरसा

खोटं कौतुक,
हेच रोजचं अन्न झालं की
मनाची भूकच बदलते...
चौकटीत अडकलेला माणूस
आरशालाही खोटं ठरवू लागतो,
कारण खरं पाहण्याची
सवयच त्याच्यात उरलेली नसते.

‘तू फार छान’, ‘तुझ्याशिवाय काहीच नाही’ —
अशा गोडगोड शब्दांत गुरफटत
तो स्वतःच्या शून्यतेवर
भ्रमाचं सिंहासन उभारतो.
आणि जेव्हा कुणी
चौकटीबाहेरचा सत्याचा चेहरा
खर्‍या आरशात दाखवतं,
तेव्हा तो नजर चुकवतो,
आणि दोषी ठरवतो —
आरशाला नव्हे,
तर तो आरसा धरून ठेवणाऱ्या
निर्भय हातांना.

सत्याचं दार उघडलं की
प्रकाश डोळ्यांत झोंबतो —
कारण अंधारात स्वप्नं पाहणाऱ्या
नजरेला तो प्रकाशही
शाप वाटतो.

पण सत्य
नेहमी चौकटीबाहेरच उभं असतं —
तडफडतं, भिडतं,
झाकून ठेवलेल्या खोट्याला
धैर्याने उघड करतं...
निर्भीडपणे, नि:संकोचपणे.

राजकारण असो वा समाजकारण —
चूक जिथे आहे,
तिथे थेट विरोध करायलाच हवा.
तोंड दाबून गप्प बसून
कधीच काही बदलत नाही.
आणि तळवे चाटणाऱ्यांचा
इतिहास कधीच लिहिला जात नाही.

इतिहास लिहिला जातो
त्यांच्यावर —
जे पडले, उठले, भिडले,
आणि शेवटपर्यंत
सत्यासाठी एकटे उभे राहिले.

कौतुक हे
पाठीवरच्या थापेवरून नव्हे,
तर छातीवरच्या जखमांवरून ठरतं —
जेव्हा तुम्ही
भीतीच्या चौकटी मोडता,
आणि
धैर्याच्या मातीत
पहिलं पाऊल टाकता…

...आणि मग
त्या पावलाच्या मागे
इतिहास चालत येतो —
मौन फोडणाऱ्या शब्दांसोबत,
आणि सत्य झेलण्यास
सज्ज असलेल्या दिठीसोबत.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १८/०६/२०२५ वेळ : ०९:१८

Post a Comment

Previous Post Next Post