कविता - स्मृतीच्या राखेतून
ज्यांनी आयुष्याला
खरा अर्थ दिला,
त्यांच्या नावाची
जपतो मी पवित्रता
स्मृतीच्या राखेतून
फुलले जीवन
तेच उजळवतात
आजच माझा
उद्याचाही क्षण
ज्यांच्या स्पर्शातून
माया झिरपली,
ज्यांच्या शब्दांनी
दिशा दाखवली,
तीच ऊब अजुनी
माझी साथ देते,
शेवटच्या भेटीतून
आरंभ नवा देते.
निरोप देताना
सांडलेले अश्रू,
त्या नजरा अजूनही
मनात विसावल्या…
त्या आठवणींना
मनात जपतो,
त्यांच्या चेहऱ्यात
स्वतःचे प्रतिबिंब पाहतो,
आणि जाणवतं…
ते गेले नाहीत…
तेच झालेत
मनमंदिरातील दीपज्योती…
तेच आहेत
प्रत्येक प्रेरणेच्या पाठीशी,
प्रत्येक नवप्रभेच्या प्रकाशात
त्यांचं अस्तित्व जाणवतं…
आणि जीवनात
पुन्हा उमलते
त्यांचे अमर…
पवित्र कवन.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०४/२०२५ वेळ : ०१:०३
Post a Comment