कविता - रात्र, अश्रू आणि मौन...
नेहमीसारखंच —
तू रडवलंस...
शब्दांनी नव्हे,
तुझ्या मौनाने.
माझ्या अश्रूंवरून चालत गेलीस,
आणि जणू तुझी पायवाट —
पावसात हरवली
कधीच परत न सापडणारी...
रात्र केवळ मिट्ट काळोखाची नव्हती,
तर ती तुझ्या मौनाची
एक आर्त हाक होती,
आणि मी —
दररोज मरणाऱ्या आशेचा
वजा होत जाणारा श्वास.
तुझं शेवटचं "नाही"
माझ्यासाठी दरवेळी
एक अंत ठरत गेलं...
कातरवेळेपासून पहाटेपर्यंत
मी वाट पाहिली —
फक्त एकदा,
"तू" बोलावंस, म्हणून.
पण जर कधीतरी
मीच उठलो नाही तर...?
कदाचित तुझ्या अधरातून
शब्द गळतील,
नजरेतून अश्रू ओघळतील,
आणि झोप...
तुला असह्य वाटू लागेल.
तेव्हा तुला समजेल —
झोप म्हणजे केवळ विश्रांती नव्हे,
तर कोणाच्यातरी आयुष्यावर
कोसळलेलं शापित मौन असतं.
तुला रात्र वैरी भासेल,
आणि माझं मौन —
असह्य करणारा आरडाओरडा.
...पण तेव्हा उशीर झालेला असेल,
कारण मी
माझ्या शेवटच्या अश्रूत
तुझं नाव लिहून झोपलो असेन —
कायमचा.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २६/०६/२०२५ वेळ : ०१:५३
Post a Comment