स्पर्धेसाठी
शब्दसेतू साहित्य मंच, पुणे
आणि
मोरणा कवीकट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्यलेखन स्पर्धा २०२५
फेरी क्रमांक : ५ (अंतिम फेरी)
विषय : अपयश
काव्यप्रकार : मुक्तछंद
शीर्षक : शोध
सुकलेल्या फुलांनी
सुगंध गमावला,
तरीही त्यांचा परिमळ
आसमंतात दरवळत राहतो…
तसंच काहीसं झालं माझंही –
हरवले स्वप्नांचे स्वर,
पण सूर अजूनही
रेंगाळतात काळजाच्या खोलात.
झळाळत्या प्रकाशात
माझा अंधार उघडा पडतो,
वाऱ्याच्या विरुद्ध धावल्यावर
थकवा श्वासात उतरतो,
पण त्या थकव्याच्या
घामात मिसळलेली जिद्द
जिवंत ठेवते मला!
हो… अपयश आलं
ओंजळीतलं पाणी सांडल्यासारखं,
पण त्या थेंबांनीच
नवे अंकुर रुजवले –
मी हरलो नाही,
मी शोधलं स्वतःला नव्याने.
डोंगराकडे पाहिल्यावर
खोल दरी हसली, म्हणाली —
"तू नाही पोहोचणार!",
मी मात्र शांतपणे,
त्या दरीच्या तळातूनही
ताऱ्यांना पत्र पाठवत राहिलो…
कारण मला माहीत होतं —
अपयश हे अंतिम नसतं,
ते तर एक सुंदर विरामचिन्ह,
ज्यांनी ते शेवट मानलं —
ज्यांनी पान मिटलं –
त्यांच्यासाठीच 'शेवट' ठरलं.
मी मात्र
तेच पान नव्या दृष्टीने वाचलं,
शब्दांची नवी गाथा रचली,
आणि अपयशाचे
आभार मानले —
मला खराखुरा
‘मी’ शोधून देण्यासाठी…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/०६/२०२५ वेळ : २१:४२
Post a Comment